मौर्यांच्यानंतर ख्रिस्तपूर्व एक दोन शतकांपासून ख्रिस्तोत्तर दोन
शतकांपर्यंत सातवाहन अथवा आंध्रभृत्य या राजांचा अंमल महाराष्ट्रावर होता.
हे घराणे सनातनी होते की अन्यधर्मीय परके होते यासंबंधी मतभेद आहेत.
इतिहासाचार्य राजवाडे त्यांना हिंदुधर्माचे कट्टर पुरस्कर्ते मानतात. ते
अळूची भाजी व भात खाणारे, त्यांच्या रथाच्या बैलांचे कान फाडलेले आणि आंध्र
राजांचे सेवक म्हणवणारे असे होते, अशा अर्थाची काही अनुमाने राजवाडे यांनी
सातवाहनांसंबंधी राधामाधवविलासचंपूच्या प्रस्तावनेत काढली आहेत.
महाराष्ट्रावर राज्य करणारे महाराष्ट्रीय घराणे हे पहिलेच, हे नक्की.
राजसत्तेसाठी या घराण्यात व खड्गाराट घराण्यात बर्याच चकमकी झाल्या. नहपाण
खड्गाराटाने सातवाहनांचा पराभव केल्याचा उल्लेख नाशिक व कार्ले इथल्या
शिलालेखांत आहे. परंतु पुढे लगेच सातवाहन गौतमीपुत्र आणि पुलयामी या
दोघांनी खड्गाराटाचा पराभव करून आपला प्रदेश पुन्हा काबीज केला. काही
काळाने गौतमीपुत्राचा पराभव माळव्याच्या रुद्रदामन् या क्षत्रप राजाने केला
व अशा रीतीने सातवाहनांची राजवट संपली.
सातवाहनांनंतर महाराष्ट्राच्या पश्चिम भागावर त्रैकूटक नावाचे राजे
ख्रिस्तोत्तर तिसर्या शतकाच्या मध्यापासूनच राज्य करत असल्याचा दाखला
कान्हेरी येथील शिलालेखांवरून मिळतो. या राजांची सत्ता आपल्या नावाचा राजशक
सुरू करण्याइतकी मजबूत झाली होती. त्रैकुटकांचा शक इ. स. २४९पासून सुरू
होतो.
त्रैकुटकांनंतर महाराष्ट्रावर सार्वभौमत्व वाकाटक राजांनी गाजवले.
यांच्या साम्राज्यात सर्व महाराष्ट्र व शिवाय उत्तरेकडील काही प्रांत येत
असे. यांच्याच राजवटीत उत्तरेकडील सम्राट समुद्रगुप्ताने दक्षिणेत स्वारी
केली. कालिदासाने आपल्या रघुवंशात रघूने केलेल्या स्वारीचे वर्णन या
समुद्रगुप्ताच्या स्वारीचेच आहे की काय, अशी विद्वानांना शंका आहे.
समुद्रगुप्ताच्या या स्वारीचं वर्णन एका शिलालेखात आहे. त्यात एरंडपल्लीचा
दमन आणि देवराष्ट्राचा कुबेर या दोन राजांचा त्याने पराभव केल्याचा उल्लेख
आहे. एरंडपल्ली म्हणजे खानदेशातील एरंडोल व देवराष्ट्र म्हणजे सातारा
जिल्ह्यातील (तासगाव तालुका) देवराष्ट्र ही गावे होत. देवराष्ट्राजवळच जे
शंकराचं स्थान आहे, त्याला सागरेश्वर अथवा समुद्रेश्वर असं म्हणतात. यावरून
समुद्रगुप्ताच्या नावाचा याच्याशी संबंध असावा. काही विद्वानांच्या मते
एरंडपल्ली व देवराष्ट्र ही दोन्ही स्थळं महाराष्ट्रात नसून तामिळनाडूत
आहेत.
वाकाटकांनंतर कलचूरी घराण्याचा महाराष्ट्राशी संबंध आला. या घराण्याने
त्रैकूटकांचा राजशक सुरू केला होता. त्यावरून कदाचित हे घराणे
त्यांच्यापैकीच असावं, असं वाटतं. कलचूरींचा पराभव मंगलीश नावाच्या
चालुक्याने करून चालुक्यांची सत्ता जी महाराष्ट्रात स्थापन केली ती
निर्वेधपणे इ. स. ७५३पर्यंत मोठ्या भरभराटीने चालली. चालुक्यांचा अंमल
९९,००० गावांवर व महाराष्ट्राच्या तीन विभागांवर होता, अशा मजकुराचा एक
शिलालेख आहे.
मध्ये काही काळ चालुक्यांवर गंडांतर येऊन त्यांना राष्ट्रकूटांकडून
पराजय पत्करावा लागला होता. राष्ट्रकूट घराण्यांपैकी एकोणीस राजांनी इ. स.
७५३पासून ९७४पर्यंत मराठवाड्यात असलेल्या मान्यखेट (मालखेड) इथे अविच्छिन्न
सत्ता गाजवली. या वंशातील दुसरा कर्क या राजाचा चालुक्यवंशीय तैलप
नावाच्या राजानं पराभव करून आपली गमावलेली सत्ता पुन्हा दीडशे - सव्वादोनशे
वर्षांनंतर मिळवली. चालुक्यांच्या मोठ्या साम्राज्यात काही मांडलिक राजे
होते. या मांडलिकांपैकी सेउणदेशीय मांडलिक आणि माळव्याचा भोज यांच्यात
चकमकी झाल्या. शेवटी सेउणचंद्राने चालुक्यसत्ता कायम केली. चालुक्यांचा
अंमल इ. स. ११८९पर्यंत निर्वेध चालला. पुढे शेवटचा सोमेश्वर मरण पावल्यावर
त्याचे मांडलिक आपआपसांत भांडून आपल्या जागीच प्रबळ झाले व मध्यवर्ती
चालुक्यसत्तेचा नाश झाला.
चालुक्यांनंतर यादवांची राजवट सुरू झाली. यांचा मुख्य प्रस्थापक भिल्लम
नावाचा राजा होता. यादव घराण्याच्या शाखा दोन. एक दक्षिणेकडील
द्वारसमुद्राची शाखा आणि दुसरी उत्तरेकडील देवगड-देवगिरीची शाखा. या दोन्ही
शाखा आपआपसांत भांडत असत. शेवटी भांडणात देवगिरीचा सिंधण राजा विजयी झाला व
त्याच्याच वंशाने पुढे चौदाव्या शतकाच्या आरंभापर्यंत राज्य केलं. इ. स.
११८९पासून ते १३१२पर्यंतच्या काळात यादवांच्या कुळात एकंदर सात राजे झाले.
मराठा धर्म, मराठी भाषा, मराठी वाङ्मय यांच्या दृष्टीनं यादवांची राजवट ही
उल्लेखनीय आहे. यादवांच्या राजवटीत मराठी भाषा व वाङ्मय यांचा आरंभ व
परिपोष झपाट्याने झाला. यादवांचं राज्य सुरळीत चालयामुळे संत, संन्यासी,
कवी अव्वल दर्जाचं काव्य निर्माण करू शकले. कृष्ण, महादेव व रामदेव या
राजांच्या काळात प्रजेला भरपूर संपन्नता लाभली. पण दुर्दैवानं महमदीयांची
नजर दक्षिणेकडे वळली व अल्लाउद्दिनाच्या नेतृत्वाखाली त्यांच्या झुंडी येऊन
यादवांची राजवट लयाला गेली. शेवटी मलीक काफ़ूराने शंकरदेव यादव याला ठार
मारून यादव सत्तेचा अंत केला.
महाराष्ट्रातील वसाहतीचा व राजसत्तेचा हा इतिहास. उत्तरेकडून दक्षिणेत
जे लोक आले ते वेगवेगळ्या प्रांतांतून आले आणि येताना आपल्या भाषा घेऊन
आले. अर्धमागधी, शौरसेनी, महाराष्ट्री, मागधी वगैरे भाषा अशा प्रकारे
महाराष्ट्रात आल्या. या सर्व भाषांच्या खुणा आज मराठीत सापडतात. पण मराठीची
उत्पत्ती झाली कशी?
अगदी जुन्या भाषा कशा उत्पन्न झाल्या, हा तसा वादग्रस्त व अनेक
दृष्टींनी अनिश्चित असा विषय आहे. संस्कृत, फारसी, लॅटीन या भाषा कशा
निर्माण झाल्या, किंवा द्राविड भाषा किंवा चिनी भाषा कशा उत्पन्न झाल्या,
हा विषय आपण सोडून देऊ. पण अलीकडच्या काळात एक भाषा नष्ट होऊन नवी भाषा कशी
व का उत्पन्न होते, हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे.
ज्ञानेश्वरीपासून आतापर्यंत मराठी भाषेच्या स्वरूपात काळानुसार थोडा फरक
होत गेला आहे. परंतु भाषा एक असून तिला आपण मराठी असंच म्हणतो. ही मराठी
भाषा ज्ञानेश्वरांपूर्वी उत्पन्न झाली आणि पूर्वी इथे प्रचलित असलेली
महाराष्ट्री भाषा मृत झाली. मराठी भाषा कशी उत्पन्न झाली याचा विचार करत
असताना ती तशी का उत्पन्न झाली, हा विचारही करावा लागतो. मूळात नवीन भाषा
तयार का होतात?
कोणत्याही भाषेला तिचे बोलीचे स्वरूप जाऊन साहित्यिक स्वरूप प्राप्त
झालं म्हणजे ती स्वत: नाहिशी होऊन इतर भाषांचा जन्म होतो, असा सिद्धांत
काही भाषातज्ज्ञ मांडतात व त्याला आधार आर्यभाषांचा देतात. वैदिक
संस्कृतापासून ज्या वेळी साहित्यिक भाषा तयार झाली त्या वेळी प्राकृत भाषा
निर्माण झाल्या व बोली म्हणून त्यांनी आपलं वर्चस्व गाजवण्यास सुरूवात
केली. या प्राकृत भाषा ज्या वेळी साहित्यिक भाषा म्हणून साच्यांत जाऊन
बसल्या त्या वेळी बोली म्हणून त्यांनी गाजवलेले वर्चस्व अपभ्रंश
भाषेने आपल्याकडे घेतलं. पुढे काळाच्या ओघात या अपभ्रंश भाषेनं साहित्यिक
भा्षेचं स्थान मिळवलं आणि सिंधी, हिंदी, गुजराती, मराठी या बोली म्हणून
उदयास आल्या, असा एक सिद्धांत आहे. परंतु हा सिद्धांत फारसा पटत नाही.
एखाद्या भाषेच्या उद्भवास तिच्या पूर्वभाषेचं साहित्यिक स्वरूप जर कारणीभूत
असेल, तर हिंदी, गुजराती, बंगाली, मराठी या आधुनिक भाषांना सध्या
साहित्यिक स्वरूप प्राप्त झाल्यानं त्या मरून त्यांच्यापासून नवीन भाषांनी
जन्म घ्यायला हवा होता. परंतु तसं झालेलं दिसत नाही. मराठी भाषा तर गेली
अनेक शतकं साहित्यिक भाषा म्हणून टिकून आहे आणि असं असूनही तिचा विकासच
होतो आहे. कोणतीही भाषा साहित्यिक होणं हे तिच्या उत्कर्षाचं गमक आहे,
तिच्या अवनतीचं नव्हे आणि तिच्या नाशाच तर नव्हेच नव्हे. उलट साहित्यिक
भाषेचं कायमचं न बदलणारं स्वरूपच तिच्यापासून दुसरी भाषा उत्पन्न होण्यास
विरोध करतं. बोली जशी परिवर्तनशील असते तशी साहित्यिक भाषा असत नाही.
परिवर्तनशील बोलीपासूनच दुसरी भाषा निर्माण होणं अधिक शक्य आहे. तेव्हा
नवीन भाषा तयार होण्याचं कारण भाषेचं साहित्यिक स्वरूप नसून दुसरं काही
असलं पाहिजे. समाजाला धक्का बसल्याखेरीज कोणतीही भाषा बदलत नाही.
लोकक्रांती, राज्यक्रांती, धर्मक्रांती वगैरेंसारखा जबर धक्का समाजाला
बसल्याखेरीज भाषा बदलत नाही. आर्यभाषेच्या स्वरूपांत निरनिराळी अवस्थांतरं
ज्या ज्या काळांत झाली त्या त्या काळांत अशा तर्हेची क्रांती झाल्याचं
इतिहासावरून दिसतं. मराठीच्या उत्पत्तीच्या बाबतीत अशा प्रकारची झालेली
क्रांती सांगण्यापूर्वी तिची उत्पत्ती कशी झाली, हे बघणं आवश्यक आहे.
कोणत्याही भाषेचं स्वरूप अभ्यासताना तिच्या अंतरंगाचा विचार करावा
लागतो. बाह्य स्वरूपात फक्त शब्दांचाच संबंध येत असल्यामुळे त्यांचा विचार
बाजूला ठेवून वर्णप्रक्रिया, प्रत्ययप्रक्रिया, प्रयोगप्रक्रिया इत्यादी
गोष्टी काळजीपूर्वक तपासाव्या लागतात. पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत,
प्राकृत, अपभ्रंश इत्यादी भाषांच्या स्वरूपावरून जर सहज नजर फ़िरवली तर त्या
प्रत्येकीच्या स्वरूपातले काही घटक मराठीत आल्याचं कळून येतं व अशाप्रकारे
पूर्वीच्या निरनिराळ्या भाषांची बरीच साम्यं मराठीत आढळून येतात, आणि
म्हणूनच मराठीच्या उद्गमाविषयी विद्वानांमध्ये मतभेद झालेला दिसतो.
पूर्ववैदिक, पाली, अर्धमागधी, संस्कृत, अपभ्रंश, माहाराष्ट्री या सार्या
भाषांना मराठीचं जनकत्व बहाल केलं जातं. मराठीच्या उद्गमाविषयी अशा
प्रकारचं मतवैचित्र्य आहे. या प्राचीन भाषांचे अवशेष मराठीत सापडतात, हे
यामागचं कारण.